चिपळूण (प्रतिनिधी) : मौजे काजीर्डा, ता. राजापूर येथील प्रस्तावित जामदा मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी दिव्यांग शेतकरी अशोक पवार यांनी शुक्रवार, दि. १ मे महाराष्ट्र दिनी कापसाळ येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. आमदार शेखर निकम यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर तसेच रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीचे अध्यक्ष व चिपळूण अपंग सेवा संस्थेचे सचिव अशोक भुस्कुटे यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन पवार यांचे उपोषण सोडवण्यात आले. या आंदोलनातील प्रमुख मागणी मान्य, यामध्ये २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना कायद्याची पारदर्शक अंमलबजावणी करून प्रकल्पग्रस्तांना हक्काचे पुनर्वसन व वाढीव मोबदला मिळावा, या मागणीसाठी पवार यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. कापसाळ पाटबंधारे विभागाच्या मनमानी व दिरंगाईच्या कारभाराला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले. अखेर संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात लेखी हमीपत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी भुस्कुटे, चिपळूण पंचायत समितीचे सदस्य व सभापती शौकत माखजनकर, कोकण पुनर्वसन समितीचे सदस्य दिलीप गायकवाड, ह्यूमन राइट्स संस्थेचे अध्यक्ष उदय घाग, राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश गुडेकर, विनायक सावंत आदींसह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत प्रशासनाने लेखी आश्वासनाची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी केली.
जामदा प्रकल्पग्रस्त दिव्यांगाचे आमरण उपोषण यशस्वी; लेखी आश्वासनानंतर स्थगित कापसाळ येथील पाटबंधारे कार्यालयासमोर १ मे रोजी उपोषण आ. शेखर निकम यांच्या शिष्टाईला यश
RELATED ARTICLES



