चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण–मिरवणे रस्त्यावर दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढत असून यामुळे नागरिक, प्रवासी, शाळकरी मुले तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र याबाबत जबाबदार अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा कुंठीत झाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा रस्ता प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत आरसा बनला असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघातांचा धोका वाढला असून, शाळकरी मुलांचे दैनंदिन प्रवास धोकादायक झाला आहे. शेतकरी वर्गालाही शेतीमाल वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत करणी सेना भारतचे मंत्री दिपक पाटील यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “चिपळूण–मिरवणे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून प्रशासन पूर्णपणे झोपलेले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर ठोस दबाव टाकून नागरिक व प्रवाशांच्या अडचणींचे तातडीने निवारण करावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून दिला जात असून प्रशासन यावर कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिपळूण-मिरवणे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य* *प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरसा ठरत असल्याचा आरोप*
RELATED ARTICLES



