
दि.14 एप्रिल 2026 यादिवशी विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ, चिपळूण ने माधवराव परांजपे यांनी विद्याभारतीसाठी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या हॉलमध्ये हे व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानाचे यावर्षीचे पहिले पुष्प माजी सनदी अधिकारी श्री. अविनाशजी धर्माधिकारी यांनी भारतीय शिक्षण पद्धती – काल, आज आणि उद्या या विषयावर गुंफले. या कार्यक्रमाला एस.आय ग्रुप इंडियाचे श्री. सचिन अणेराव प्रमुख पाहुणे तर चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव या प्रमुख अतिथी होत्या. या कार्यक्रमाला विद्याभारती कोकण प्रांताचे अध्यक्ष प्रदीप पराडकर, प्रांत मंत्री संतोष भणगे, सहमंत्री विनयकुमार रानडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल (रिटा.) श्री हेमंत भागवत उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष सुमेध करमरकर, कार्यवाह छायाताई मुसळे, कोषाध्यक्ष स्वाती ढोल्ये, स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांत सावर्डेकर, सदस्य सुरेश कशेळकर, प्रकाश बापट, विद्याभारतीच्या जिल्हाध्यक्षा प्रा. सोनाली खर्चे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माधवराव परांजपे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून झाल्यावर त्यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्व. माधवराव परांजपे यांच्या धर्मपत्नी व संस्थेच्या सदस्या वंदनाताई परांजपे यांचा कृतज्ञता सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी मेकॉलेची शिक्षण पद्धती, गुरुकुल पद्धत, गांधीजींची शिक्षण विषयक संकल्पना तसेच काल, आज आणि उद्या या शिक्षणाचे सूत्र म्हणजे ‘स्व’ ची ओळख आणि त्याचा विकास हेच असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार ओक यांनी तर वैद्य अमेय भावे यांनी गीत सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता जोशी यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे निमंत्रक वैद्य अतिन औताडे होते. कार्यक्रमाची सांगता विद्याभारती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरमने केली.




