पुणे- मुंबई-सोलापूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला पुणे रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला असून गाडीचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पथक पाठवून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाड किंवा ट्रॅकशी संबंधित समस्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याबाबत सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या दिशेला जात असताना वंदे भारत ट्रेनचा डबा रेल्वे रुळावरुन खाली घसरला आहे.
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रशासनाकडून युद्द पातळीवर दुरुस्तीचे प्रयत्न सुरु आहेत. रेल्वे प्रशासनासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सर्व प्रवाशांना सुखरुपणे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर नेले जात आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे कुणाला दुखापत झालेली नाही. पण यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला जावं लागत आहे. नियोजित वेळेत आपल्याला अपेक्षित ठिकाणी जाता येणार नाही याची खंत प्रवशांना सतावत आहे. असं असलं तरी या घटनेत सुदैवाने कोणती हानी झाली नाही यावरुन समाधानही व्यक्त होत आहे. आता प्रशासानकडून किती वेळात दुरुस्तीचे काम पूर्ण होते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून संध्याकाळी चार वाजता ही ट्रेन निघाली होती. ही ट्रेन पुणे स्थानकाजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या दिशेला जात असताना या ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला. वंदे भारत एक्सप्रेसचा सहावा डबा रुळावरुन खाली घसरला आहे. जवळपास दोन ते अडीच तासापांसून ही ट्रेन स्थानबद्ध झाली आहे. घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, ट्रेनमधील प्रवाशांमध्ये चिंतेचे वातवरण आहे. आता पुढचा प्रवास कसा करायचा आणि दुरुस्तीला किती वेळ लागतो याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे प्रवासी चिंतेत आहेत. विशेष म्हणजे या घटनेनंतर रेल्वेच्या इतर वाहतुकीवर काही परिणाम होतो का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. रात्रीची वेळ असल्याने मुंबईहून अनेक गाड्या या पुण्याहून पुढच्या दिशेला जातात. यामध्ये दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांसह सोलापूर सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेससह इतर गाड्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे दुरुस्ती करण्याचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचं आव्हान रेल्वे प्रशासनापुढे आहे.



