रत्नागिरी (जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १२ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) (३) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात आगामी काळात विविध सण, उत्सव तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ३० एप्रिल रोजी श्री नृसिंह जयंती, १ मे रोजी भगवान बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिन, तर ५ मे रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे. तसेच विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलने होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. खेड, चिपळूण, अलोरे-शिरगाव, रत्नागिरी, जयगड आणि देवरुख परिसरातील औद्योगिक क्षेत्रे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ संदर्भातील आंदोलने, तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे, लाठ्या, तलवारी, सुरे, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगणे, दगड किंवा हत्यारे गोळा करणे, शांततेला बाधा आणणारी भाषणे करणे, आक्षेपार्ह घोषणा देणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी विनापरवाना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्नसमारंभ, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी तसेच सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. मनाई आदेशाच्या कालावधीत मोर्चा, मिरवणूक, सभा किंवा निवडणूक प्रचारसभा आयोजित करावयाची असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात १२ मेपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू
RELATED ARTICLES



