चिपळूण : उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यभरात शोक व्यक्त केला जात आहे. चिपळूणमधील पत्रकारांच्यावतीनेदेखील आज शनिवारी स्व. पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दादांच्या निधनाने राज्याचे अपरिमित हानी झाल्याची भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, मकरंद भागवत, राजेंद्रकुमार शिंदे, गजेंद्र खडपे, संतोष पिलके, दीपक शिंदे, जमालूद्दीन बंदरकर, छायाचित्रकार अनिल फाळके आदि उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार श्री. कदम म्हणाले की, अजितदादा यांची प्रशासनावर उत्तम पकड होती. प्रशासनावर त्यांचा आदरयुक्त दरारा होता. सर्वसामान्य लोकांसाठीचं ते आयुष्यभर झटले. त्यांची कामाप्रती तळमळ आणि सचोटी वाखाणण्याजोगी होती. राजकीय पक्ष म्हटलं की अनेक विचारधारा असतात. तरीसुद्धा अजितदादा हे सर्वांपेक्षा निराळे होते. त्यांची लोकप्रियता अफाट होती. पुरमुक्त चिपळूण शहरासाठी त्यांनी एका क्षणात सुमारे १० कोटींचा निधी मंजूर केला. दादा विकासाचे भोक्ते आणि शब्दाचे पक्के होते. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या सारखा लोकनेता पुन्हा होणार नाही, अशा शब्दांत आदरांजली व्यक्त केली.
*दादांच्या निधनाने राज्याने उत्तम प्रशासक-लोकनेता गमावला* *स्व. अजितदादा पवार यांना चिपळूणमधील पत्रकारांतर्फे आदरांजली*
RELATED ARTICLES



