*मुंबई-* राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत ६६ हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधी पक्षांनी गंभीर आरोप केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का? याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजयी घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगित करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने बिनविरोध उमेदवारांचा अहवाल मागवला आहे.
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीच जवळपास ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार सत्ताधारी महायुतीचे म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आहेत. इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर कोणताही दबाव टाकून, आमिष दाखवून किंवा जबरदस्ती करून त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले आहे का, याची तपासणी केली जाईल.
निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही आणि अहवाल सादर केला जात नाही, तोपर्यंत संबंधित उमेदवारांना अधिकृतपणे ‘विजयी’ घोषित करू नका, असे आदेश आयोगाने दिले आहेत. ही चौकशी पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जर चौकशीत काही गैरप्रकार आढळले, तर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.



