Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुन्हा पुन्हा पहावं असं ‘एकदा पाहावं करून’ नाटक आता चिपळूण-रत्नागिरीत

पुन्हा पुन्हा पहावं असं ‘एकदा पाहावं करून’ नाटक आता चिपळूण-रत्नागिरीत

चिपळूण (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालणारं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक आता कोकणात रंगणार आहे. १६ एप्रिल रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात तर १७ एप्रिल रोजी चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात या गाजलेल्या नाटकाचे प्रयोग होणार असून, नाट्यरसिकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी रंगभूमीवर सध्या एक भन्नाट कॉमेडी नाटक प्रेक्षकांच्या चर्चेत आहे, ‘एकदा पाहावं करून’. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर आलेलं हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडत आहे. ६ डिसेंबरपासून या नाटकाचा शुभारंभ झाला असून पुणे आणि मुंबईमध्ये त्याचे प्रयोग तुफान गाजत आहेत. सोशल मीडियावरही या नाटकातील प्रसंगांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहेत. आता हे नाटक कोकणातही रंगणार असून १६ एप्रिल रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आणि १७ एप्रिल रोजी चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात त्याचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या नाटकातील प्रमुख कलाकार वैभव मांगले हे देवरूखचे सुपुत्र असून गौरी फणसे महाजन या चिपळूणच्या आहेत, त्यामुळे स्थानिक प्रेक्षकांचा उत्साह अधिक वाढला आहे. हे नाटक नातेसंबंधांमधील गोडवा आणि वास्तवातील बोचरेपणा हलक्याफुलक्या विनोदातून मांडतं. कथानकाच्या केंद्रस्थानी दोन पूर्णपणे भिन्न स्वभावाचे मध्यमवयीन पुरुष आहेत. बाप्पाजी धारसोड, बिनधास्त, पैशातून सत्ता मिळवणारा; आणि बाबनराव बक्रे, भित्रा पण स्वतःला नैतिकतेचा कट्टर पुरस्कर्ता समजणारा वकील. या दोघांच्या जगांची टक्कर होते, तेव्हा निर्माण होतो गैरसमज, गोंधळ आणि हास्याचा धमाल प्रवास. या सगळ्यात ट्विस्ट येतो तो त्यांच्या मुलांच्या प्रेमप्रकरणामुळे. बाबनरावची मुलगी आणि बाप्पाजींचा मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्नाचा निर्णय घेतात. या पार्श्वभूमीवर घडणारे प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात, पण शेवटी एक गंभीर प्रश्नही उभा करतात. माणूस नैतिकतेमुळे ‘चांगला’ असतो की संधी नसल्यामुळे? अभिनयाच्या बाबतीतही हे नाटक तितकंच दमदार आहे. भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील, आनंद इंगळे आणि वैभव मांगले यांसारख्या अनुभवी आणि तरुण कलाकारांचा प्रभावी सहभाग नाटकाला अधिक रंगतदार बनवतो. हास्य, नातेसंबंध आणि वास्तव यांचा सुरेख मिलाफ असलेलं ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक खरंच एकदा पहायलाच हवं, असं प्रेक्षकांचं मत होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments