चिपळूण (प्रतिनिधी) : आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे नेटके संयोजन , यामुळे चिपळूणवासिय रसिकांना दरवर्षी ओढ लावणारी कीर्तनमाला १२ जानेवारी पासून सुरु होत आहे. यंदाच्या दशकपूर्ती कीर्तनमालेत राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप श्री. चारूदत्तबुवा आफळे पेशवाईचा सुवर्णकाळ उलगडणार आहेत . दि . १२ ते १६ जानेवारी कालावधीत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात संपन्न होणारी ही कीर्तनमाला दरवर्षी प्रमाणे रसिकांसाठी विनामूल्य असुन प्रेक्षागृहातील पहिल्या काही आसन रांगा निमंत्रित व आयोजक परिवारासाठी राखीव असणार आहेत.
गेली नऊ वर्षे रसिकांचे भरभरून प्रेम लाभलेली यंदाची कीर्तनमाला दर दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्रौ ९.३० या कालावधीत संपन्न होणार आहे. कीर्तनमालेचे उदघाटन सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आफळेबुवा यांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीत साथीदारांची नेटकी साथ असते . यावर्षी सहकारी कलावंत म्हणून तबला साथ मिलिंद तायवाडे , पखवाज साथ मनोज भांडवलकर व ऑर्गन साथ चिंतामणी निमकर करणार आहेत. दरवर्षी ओढ लावणारा श्रवणीय कीर्तनाचा जागर रसिकांसाठी पर्वणी असतो. विषयाला साजेसे रंगमंच नेपथ्य, अनुरूप असणारी वातावरण निर्मिती व विनामूल्य प्रवेश यामुळे श्री स्वामी चैतन्य परिवाराची ही कीर्तनमाला गेली नऊ वर्षे स्मरणीय ठरत आली आहे.
चिपळूण बापट आळी येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम उपासक परमपूज्य श्री गुरूमाऊली सद्गुरू वासुदेव दळवीकाकामहाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या या कीर्तनमालेत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे पैलू राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे आपल्या अभ्यासपूर्ण विवेचन व सुश्राव्य सादरीकरणातुन उलगडत असतातं. मराठेशाहीच्या इतिहासाचा मागोवा घेणारया येत्या कीर्तनमालेत रसिक श्रोत्यांना ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ ऐकता येणार आहे. पानिपतची लढाई कशी झाली? त्यात आपण काय कमावले व काय गमावले ? श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची अल्प काळाची कारकीर्द दैदिप्यमान कशी होती ? आनंदीबाई पेशवा यांचा खरा इतिहास काय ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ मधून ऐकता येणार आहेत. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील जागेची मर्यादा लक्षात घेऊन रसिकांनी विनामूल्य प्रवेश आसन रांगा व्यवस्थेचा लाभ घेण्याचे दृष्टीने कार्यक्रमाचे नियोजित वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.
*श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित पाच दिवसीय कीर्तनमालेत ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’* *१२ जानेवारीपासून चिपळुणात प्रारंभ*
RELATED ARTICLES



