कोकणातील पहिले बंदिस्त सभागृह अशी ओळख असलेल्या आणि चिपळूणला सांस्कृतिक राजधानीचा मान मिळवून देणाऱ्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात देवेंद्र पेम लिखित “ऑल द बेस्ट” या नाटकाचा प्रयोग रात्री साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याच वेळी शेजारील चिपळूण नगर परिषदेच्या पवन तलाव मैदानावर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेअंतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेसाठी रात्री दहा वाजेपर्यंत डीजे लावण्यास परवानगी देण्यात आली होती. तरीही प्रत्यक्षात स्पीकर, डीजे, फटाके आणि जत्रेसारखा कर्णकर्कश आवाज सातत्याने सुरूच होता. या प्रचंड आवाजामुळे नाटकाचा नियोजित साडेनऊचा प्रयोग पुढे ढकलत दहा वाजता सुरू करण्याचा निर्णय मयुरेश पेम, निखिल चव्हाण आणि मनमित पेम यांनी नाट्यरसिकांशी चर्चा करून घेतला. मात्र दहा वाजल्यानंतरही परिस्थितीत कोणताही फरक पडला नाही. डीजे आणि फेपाट्यांच्या आवाजामुळे कलाकारांना नाटक सादर करणे अत्यंत कठीण झाले. घामाच्या धारा लागलेल्या अवस्थेतही कलाकार जीव ओतून काम करत होते; मात्र सातत्याने येणाऱ्या आवाजामुळे संवादांमध्ये अडथळे येत राहिले. मध्यंतरानंतर मयुरेश पेम स्वतः स्पर्धेच्या ठिकाणी गेले आणि डीजे व इतर वाद्यांचे आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र त्या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. काही काळ नाट्यप्रयोग थांबवावा लागला; तरीही कलाकारांनी सर्व अडचणींवर मात करत प्रयोग पूर्ण केला. या संपूर्ण प्रकारानंतर अभिनेते मनमित पेम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुसंस्कृत चिपळूणमध्ये हे नेमकं काय सुरू आहे? नियम फक्त कागदावरच राहिले आहेत का? प्रशासन आणि पोलीस विभाग नेमकं काय करत आहेत? आणि चिपळूणकर या मनमानीविरुद्ध गप्प का?
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या क्रिकेट स्पर्धेमुळे नाट्यप्रयोगात अडथळे; अभिनेते मनमित पेम यांची नाराजी
RELATED ARTICLES



