भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष कै. यशवंतराव तथा दादा माने यांनी १९६२ पासून जनसंघाचे काम सुरू केले. १९८० पासून भाजप सुरू केला व त्यामुळे ६२ ते ८६ या काळात जनसंघ, भाजप जिल्ह्यात रुजवला. १९७९ मध्ये पं. स. समितीचे अध्यक्ष असताना दादांनी विकासकामांचा धडाका लावला. तेव्हा रुजवलेले भाजपच्या विचारांचे रोपटे जोमाने बहरले. दादा पुलोद सरकारमध्ये मत्स्योद्योग महामंडळाचे चेअरमन (कॅबिनेट दर्जा) होते. भाजप व दादांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आज रत्नागिरीमध्ये आहे. दादांचा उद्या (ता. २) स्मृतिदिन आहे. त्यांच्या कार्याविषयी…
यशवंतराव तथा दादा माने यांचा जन्म १३ मे १९२२ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत रुईया कॉलेजला झाले. मिऱ्या गावचे मंत्री (कै.) पी. के. तथा बाळासाहेब सावंत हे नेते असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव दादांवर होता. वडिल भिकाजीराव हे शेअर बाजारात नोकरीला होते. दादांनी १९५४ मध्ये पारंपरिक रापणीचा व्यवसाय सुरू केला. मराठ्यांच्या मुलांनी व्यवसाय केला पाहिजे, या हेतूने त्यांनी मालवण, कारवार येथील मच्छीमार गोळा केले. हा व्यवसाय सचोटी, प्रामाणिकपणे १९७५ पर्यंत चालू ठेवला.
रा. स्व. संघाचे डॉ. बापूराव केतकर हे मिऱ्या येथे दवाखाना चालवत. त्यांची दादांसोबत ओळख झाली व ते संघ विचारांशी जोडले गेले. तसेच डॉ. ज. शं. केळकर यांचे भाऊ विसूभाऊ हे यशवंतरावांचे वर्गमित्र असल्याने ते जनसंघात सक्रिय झाले. १९६२ ला यशवंतराव हे मिऱ्याचे सरपंच झाले आणि तालुका पंचायत समितीचे सभापती १९८० मध्ये झाले. या पदावर काम करताना त्यांनी सामान्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले. जिल्ह्याचा दौरा करून ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचले. गावागावांत प्राथमिक शाळा सुरू केल्या. पं. स. माध्यमातून अनेक गावांमध्ये शिक्षण, आरोग्य सुविधा दिल्या. दादा १९७५ मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले आणि भाजपची नवी ओळख जिल्ह्याला होऊ लागली. खासदार बापूसाहेब परुळेकर, रामदासभाई देशपांडे, बापूराव केतकर, माजी आमदार (कै.) तात्यासाहेब नातू, (कै.) जनुभाऊ काळे, फुलवाले भाऊजी मांडवकर, यांच्यासह अनेक सहकारी एकोप्याने काम करत होते. या साऱ्यांनी विकासकामांचा धडाका लावला आणि भाजप गावोगावी रुजू लागला.
दादांचे निधन २ जानेवारी १९८६ रोजी झाले. भाजप आणि जनतेचा जणू आधारच हरवला. दादांनी त्यांच्या संस्कारांची, विचारांची शिदोरी त्यांच्या सुपुत्रांकडे सोपवली होती. बाळासाहेब माने हे महाविद्यालयीन शिक्षण घेत शेवटच्या वर्षाला होते. वडिलांनी खांद्यावर सोपवलेली जबाबदारी आता आपल्यालाच पुढे न्यायची आहे, याची जाण त्या लहान वयातही बाळासाहेबांना होती. वडिलांचा सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी बाळासाहेबांनी अपार कष्ट केले. अवघ्या ८ वर्षातच त्यांनी १९९४ मध्ये रत्नसिंधू शिक्षण प्रसारक संस्था व १९९५ मध्ये यश फाऊंडेशन स्थापन केली. एमआयडीसीमध्ये यशवंत प्राथमिक विद्यालय सुरू केले व वंचित मुलांना येथे शिक्षणाची संधी मिळाली. १९९७ मध्ये निवळी तिठा येथे ‘कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालय’ सुरू केले. २००६ मध्ये कोकणातील पहिले नर्सिंग कॉलेज सुरू केले. दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी सन २००० पासून यशवंत एसएससी मार्गदर्शन व्याख्यानमाला सुरू केली. आतापर्यंत ६० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. दादांचा वसा बाळासाहेब पुढे चालवत आहेत.
—ॲड. भाऊ शेट्ये , जिल्हाध्यक्ष (अधिवक्ता परिषद, रत्नागिरी)



