Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोकणातील फळ वाईन उद्योगाला द्राक्ष वाईनप्रमाणे सवलती द्या – आमदार शेखर निकम...

कोकणातील फळ वाईन उद्योगाला द्राक्ष वाईनप्रमाणे सवलती द्या – आमदार शेखर निकम यांची अर्थसंकल्पात ठोस मागणी

चिपळूण (संतोष पिलके ) : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करत कोकणातील आंबा, काजू, फणस, जांभूळ व करवंद यापासून तयार होणाऱ्या वाईनला द्राक्ष वाईनप्रमाणेच सवलती देण्याची ठाम मागणी केली. यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले की, द्राक्ष वाईन निर्मितीसाठी राज्य सरकारकडून विविध करसवलती, परवाना शुल्कातील सवलती तसेच विक्री केंद्रांना प्रोत्साहनपर धोरण दिले जाते. मात्र, कोकणातील स्थानिक फळांपासून तयार होणाऱ्या वाईन उद्योगाला एक्साइजमध्ये तब्बल ३०० पट अधिक शुल्क आकारले जात आहे. यामुळे नवउद्योजकांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत असून उद्योगाच्या वाढीला अडथळा निर्माण होत आहे. कोकणात सध्या आंबा, काजू, फणस, जांभूळ आणि करवंद या फळांपासून वाईन निर्मितीचे प्रयोग आणि उत्पादन सुरू आहे. या उद्योगाला चालना मिळाल्यास स्थानिक शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे द्राक्ष वाईनप्रमाणेच करसवलती, परवाना सुलभता आणि लहान विक्री केंद्रांना प्रोत्साहन देण्याबाबत स्वतंत्र धोरण निश्चित करावे, अशी मागणी आमदार निकम यांनी केली. कोकणातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना हमी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्प 2025-26 मध्ये मांडलेल्या या मागणीमुळे कोकणातील फळ वाईन उद्योगाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments